
नगर भुमापन क्रमांक 478 करोडगिरी नाक्याची जागा गेली चोरीला..?
नगर भुमापन क्रमांक 378 मध्ये 20 गुंठे जागेची वाढ कशी..?
विरुर पोलिस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी

विरुर स्टेशन येथील मुळात 478 भूमापन क्रमांक असलेली शासकीय जागा 378 भूमापन क्रमांक दाखवून शासनाची दिशाभूल करत स्थानिक व्यावसायिक यांनी आपल्या नावाने केल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर 420 चा गुन्हा नोंदवून योग्य कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली असून सदर जागा शासन जमा करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरुर स्टेशन येथे नगर भुमापन क्रमांक 378 ही जागा ‘सरकारी चाड’ असा उल्लेख भूमी अभीलेखच्या मुळ नोंदवही मध्ये नोंद असून विरुर स्टेशन येथे ही जागा कुठे गायब झाली, हे कळायला मार्ग नाही. सदर जागा चोरीला गेल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत आहे. काही काळा अगोदर करोडगीरी नाक्याचा जागेवर आठवडी बाजार सुद्धा भरत होता. आजही सदर जागेवर ग्रामपंचायतचे भवन (बैंक ऑफ इंडिया इमारत) व ग्रामपंचायत ची विहीर निशानी म्हणून मोक्यावर आहे. स्थानिक नागरिकही अचंबित आहेत की, ही जागा गेली तर गेली कुठे..? सदर “त्या” जागेवर जिल्हा परिषद शाळा, पोस्ट ऑफिस व काही जागा वनविभाग यांची अशी होती, असे ज्येष्ठ तथा वयस्क नागरिक यांचे म्हणणे आहे. परंतु सध्या सदर जागा राजकिय दबावाखाली ताबा धारकाने शासनाची दिशाभूल करून ती जागा न.भु.क्र. 378 अशी दाखवली आहे.
नभुक्र. 378 ही जागा जयराम पाटील मोरे यांचे कडुन सर्वे नंबर 141,142 पैकी 64 गुंठे खरेदी केल्याचे नोंद आहे. परंतु 64 गुंठे खरेदीची नोंद 84 गुंठे अशी रेकार्डला नोंद दाखवत आहे. भुमी अभिलेख विभागाच्या आखिव पत्रीकेत 20 गुंठे वाढवण्याचे उल्लेख सुद्धा आहे, अशी हेराफेरी कशी काय केली..? हा मोठा गहन प्रश्न आहे. या गंभीर प्रकरणाची तहसील कार्यालय, पंचायत समिती, विरुर पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत येथे पुराव्यासहित तक्रार नोंदणी केली असून शासनाने ताबा धारका विरुद्ध भारतीय दंड विधान 420, 467, 468 अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरुर स्टेशन येथील नागरिकांनी केली आहे.
ग्रामपंचायत कमेटीने वारंवार ठराव घेऊन करोडगीरी नाक्याची शासकीय जमीन भविष्यात कधीच फेरफार न करण्याचे संकेत दिले असताना ग्रामपंचायत कमेटीला अंधारात ठेवून तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गोपाल नैताम यांनी ठराव न घेता कार्यवाही वृत्तांत न लिहता राजकीय दबावामुळे ग्रामपंचायत मालमत्ता अभिलेखात परस्पर नोंद घेतली असल्याचे उघडकीस आले आहे. मालमत्ता क्रमांक 397/3 असे दाखवून काही व्यक्तींना विक्रीपत्र सुद्धा करुन दिली आहेत, असे राजकीय दबावतून घडले असून शासकीय मालमत्ता आपल्या घशात घातली असल्याचे दिसून आले आहे. यामुळे ग्रामस्थांत प्रचंड असंतोष असून शासनाची दिशाभूल करुन सदर जागा लागल्याने अजय रेड्डी यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी विरुर पोलीस ठाणे यांच्याकडे केली आहे.
सदर प्रकरण गंभीर असून प्रशासन राजकीय दबावाला बळी पडून गुडघे टेकेल की यावर योग्य ती कारवाई करेल यावर विरुर ग्रामस्थांसह परिसरातील सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.



